in

तुलसीदासांचे श्रीराम..

प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्पार्किंग पॉईंट येतो जिथे त्याचे आयुष्य बदलते. तुलसीदास रामभक्त होते मात्र त्यांनी आपले जीवन रामाला समर्पित केलेले नव्हते. मात्र त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग असा घडला की, त्यांच्या मनात थेट वैराग्य भावनाच जागृत झाली आणि त्यांनी आपले जीवन प्रभू रामचंद्रांना समर्पित केले. 

रत्नावली ही तुलसीदासांची पत्नी. अतिशय रूपवान आणि बुद्धिमान स्त्री! तुलसीदास आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत. एकदा रत्नावली आपल्या भावासोबत माहेरी गेली. तुलसीदास पत्नीच्या विरहाने व्याकुळ झाले. ते भर पावसात, रात्रीच्या वेळी, उफाणणाऱ्या यमुना नदीला ओलांडून गेले. नदी ओलांडण्यासाठी त्यांनी नदीत सोडलेल्या एका प्रेताचा वापर लाकूड म्हणून केला. त्यावर बसून हातांनी पाणी वल्हवत ते सासरी पोहोचले. 

कोणताही निरोप, आगाऊ सूचना न आपला पती असा भर रात्री अचानक समोर पाहून रत्नावलीला अतिशय संकोच वाटला. तिने तुलसीदास यांना फटकारत दोहा म्हटला. जो आजही विख्यात आहे. “अस्थि चर्ममय देह मम, तामें ऐसी प्रीति। तैसी जो श्रीराम में, होती न तौ भवभीति॥”
माझे शरीर हाडं आणि चामड्याचे आहे, त्यावर तुमचे एवढे प्रेम आहे. जर इतकेच प्रेम प्रभू श्रीरामावर केले असते, तर या संसाररुपी भयापासून तुमची सुटका झाली असती! 

पत्नीचे टोकदार शब्द तुलसीदासांच्या हृदयाला थेट लागले. त्यांना क्षणात वैराग्य प्राप्त झाले. ते पत्नीला तसेच सोडून रात्रीच्या रात्री तिथून निघून गेले आणि त्यांनी संन्यास घेतला. त्यांनी पुन्हा कधीही संसारात रस घेतला नाही. ह्या पुढच्या त्यांच्या प्रवासात अनेक आख्यायिका आहेत ज्यांचे वर्णन भिन्न साधनांत विविध पद्धतीने समोर येते. 

तुलसीदास आधी काशीला गेले. तिथून चित्रकुटला रवाना झाले. ह्या दरम्यानच एका स्मशानभूमी नजीक वास्तव्यास असताना एका प्रेताच्या माध्यमातून हनुमानांनी तुलसीदासांची कसोटी घेतली. अखेर आपले खरे स्वरूपही दाखवले. तुलसींनी मारुतीरायाचे पाय घट्ट पकडले. मारुती त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले. त्यांनी तुलसीदासांना श्रीरामांच्या दर्शनाचा मार्ग दाखवला.

तुलसीदासांची आणि राम लक्ष्मणाची भेट घालून देण्याचे मारूतीरायांनी कबुल केलेलं. ते त्यानुसार कामास लागले. एकदा चित्रकुटच्या घाटावर तुलसीदास बसून चंदन उगाळत होते. तिथे बालक रूपातील श्रीराम आणि लक्ष्मण आले. तुलसीदास त्यांना ओळखू शकले नाहीत. तेव्हा हनुमानजींनी पोपटाचे रूप घेऊन दोहा म्हटला: 
चित्रकूट के घाट पर, भई सन्तन की भीर। तुलसीदास चन्दन घिसें, तिलक देत रघुबीर॥”

हे ऐकताच तुलसीदास यांना ज्ञान झाले. प्रभू श्रीरामांनी आपल्या भाळावरचा चंदन गंध काढून स्वतः तुलसीदास यांच्या कपाळावर लावला. त्यांना दर्शन दिले. त्या दिवसानंतर तुलसींचे आयुष्य आमूलाग्र बदलले.  १५७४ साली त्यांनी अयोध्येत ‘रामचरितमानस’ लिहिण्यास सुरुवात केली. हा ग्रंथ त्यांनी तत्कालीन लोकभाषा ‘अवधी’ मध्ये लिहिला.

संस्कृत हीच देवाची भाषा मानणाऱ्या काशीच्या पंडितांनी, रामकथा लोकभाषा अवधीमध्ये लिहिल्यामुळे तुलसीदास यांना प्रचंड विरोध केला. त्यांचा ग्रंथ चोरण्याचा आणि नष्ट करण्याचा प्रयत्नही झाला. त्यांना डिवचले जाऊ लागले, त्यांना पदोपदी अपमानास सामोरे जावे लागले, मात्र ते डगमगले नाहीत. 

अशीही एक आख्यायिका आहे की, तुलसींनी लिहिलेल्या ग्रंथाचे पावित्र्य तपासण्यासाठी, स्थानिक पंडितांनी त्या ग्रंथाची परीक्षा घ्यायचे ठरवले. काशीच्या विश्वनाथ मंदिरात सर्वात खाली ‘रामचरितमानस’, त्यावर पुराणे, वेद आणि सर्वात वर अन्य शास्त्रे ठेवली गेली. रात्री मंदिर बंद केले गेले. सकाळी जेव्हा मंदिर उघडले, तेव्हा ‘रामचरितमानस’ हा ग्रंथ सर्वात वर होता आणि सत्यं शिवं सुन्दरम् ही अक्षरे उमटली होती! हे पाहून सर्व पंडितांनी तुलसीदास यांची माफी मागितली.

आजदेखील रामचरितमानस ह्या ग्रंथास रामायणाइतकीच महत्ता प्राप्त आहे. उत्तरेकडील राज्यात त्याचा मोठा प्रभाव आहे.  भारतीय संतपरंपरेत संत तुलसीदास हे केवळ कवी नव्हते; ते दुःखाच्या अग्निकुंडातून जन्मलेले एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनात जितकी रामभक्ती होती, तितक्याच तीव्रतेने नियतीचे आघातही होते. नियतीने त्यांच्या वाट्याला सुखापेक्षा संघर्षच अधिक दिला; पण त्या संघर्षालाच त्यांनी भक्तीचे रूप दिले. 

तुलसीदासांचा जन्म होताच दुःखाने त्यांच्या दारात पाऊल ठेवले. जन्मानंतर काही दिवसांतच त्यांची आई हुलसीमाता यांचे निधन झाले. त्यांचा जन्म ‘अभुक्त मूळ नक्षत्रात’ झाला होता, पंडितांच्या मते तो एक अशुभ योग मानला जाई. परिणामी तुलसीदास शिशु अवस्थेत असतानाच त्यांचे वडील आत्माराम ह्यांनी त्यांचा त्याग केला. ‘चुनिया’ नावाच्या दासीकडे तुलसीला सोपवले. 

त्यांच्याविषयीच्या आख्यायिकांनुसार जन्मल्यावर ते रडले नव्हते, त्यांचे पहिले शब्दोच्चारण राम होते! त्यामुळे रामबोला हे त्यांचे टोपणनाव! कोवळ्या वयातच आईच्या मायेचा पदर हरवलेल्या त्या बालकाला जगाच्या कठोर वास्तवाने कवेत घेतले. मायेची ऊब, पित्याचा आधार आणि घराचे छत—या तिन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यात नव्हत्या.

रामबोला केवळ साडेपाच वर्षांचे असताना दासी चुनियाचेही निधन झाले. पुन्हा एकदा तुलसीदास अनाथ झाले. भुकेची झळ, उपेक्षेची वेदना आणि एकाकीपणाचा अंधार यांच्याशी सामना करत त्यांनी बालपण व्यतीत केले. गावोगावी भटकत, दारोदारी भिक्षा मागत जगणाऱ्या त्या बालकाच्या डोळ्यांतली ज्ञानाची आणि ईश्वरप्राप्तीची ज्योत मात्र विझली नाही.

रामबोलाचे हाल पाहून भगवान शिवाच्या प्रेरणेने प्रसिद्ध संत बाबा नरहरिदास यांनी त्यांना आपल्या पदराखाली घेतले. त्यांना आपले शिष्यत्व दिले. गुरुंनी त्यांचे नाव बदलून ‘तुलसीदास’ ठेवले. 

त्यांनी तुलसीदास यांना अयोध्या आणि सुकरखेत (आताचे सोरोन) येथे नेऊन प्रभू श्रीरामाची संपूर्ण कथा ऐकवली. नरहरिदास यांनी तुलसीदासांना काशीचे प्रसिद्ध विद्वान शेष सनातन यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवले. दीड दशकाहून अधिक काळ काशीमध्ये राहून तुलसीदासांनी वेद, उपनिषदे, पुराण, इतिहास आणि षड्दर्शनांचा सखोल अभ्यास केला आणि ते प्रकांड पंडित बनले. 

विद्वत्ता मिळाल्याने दुःखाचे सावट दूर झाले नाही. सांसारिक जीवनात प्रवेश केल्यानंतर पत्नी रत्नावलीवर त्यांचे अतोनात प्रेम जडले. त्या प्रेमाने त्यांना इतके व्यापून टाकले की, मुसळधार पावसाच्या रात्री प्राणांची पर्वा न करता ते तिची भेट घेण्यासाठी नदी ओलांडून गेले. तेव्हा रत्नावलीने उच्चारलेले शब्द त्यांच्या आयुष्याचा निर्णायक क्षण ठरले!

आयुष्यात इतकं काही घडूनही त्यांच्या मनातलं अवधी भाषेविषयीचं प्रेम कमी झालं नाही! रामायणावर ग्रंथनिर्मिती करण्याचे त्यांनी निश्चित केले तेव्हा साहजिकच त्यांच्या मनात अवधी ग्रंथ रचनाच समोर आली. त्या काळात संस्कृत हीच धर्मग्रंथांची भाषा मानली जात होती. त्यामुळे अनेक कर्मठ पंडितांनी त्यांच्या कार्याला तीव्र विरोध केला. 

अवधीसारख्या लोकभाषेत रामकथा लिहिणे हे धर्माचा अपमान असल्याचे आरोप झाले. त्यांची हेटाळणी झाली, त्यांच्या विद्वत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पण तुलसीदासांचा विश्वास अढळ होता, रामकथा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, हा त्यांचा निर्धार होता. त्यांनी रामचरितमानस पूर्ण केले, त्यांची रामभक्ती अजरामर झाली. त्यांनी केलेल्या रामजागराचे आजही लोकांच्या मनावर गारुड आहे. 

तुलसीदासांनी आयुष्यभर गरिबी, अवहेलना आणि विरोध सहन केला; पण त्यांच्या लेखणीतून कटुता कधीच उतरली नाही. उलट प्रत्येक वेदना त्यांनी भक्तीमध्ये विलीन केली. म्हणूनच त्यांच्या शब्दांत करुणा आहे, समता आहे आणि माणसाला उभारी देणारा आशावाद आहे. 

रामचरितमानसची भाषा आईच्या ममतेची आणि मातृत्वाच्या कारुण्याची का आहे, याचे उत्तर तुलसीदासांच्या आयुष्यात दडलेय! ज्याच्या आयुष्याची सुरुवात अनाथपणाने झाली, ज्याने उपेक्षा, विरह आणि संघर्ष अनुभवला, त्याच संताने ‘रामचरितमानस’सारखा लोकमानसाचा अलौकिक ग्रंथ निर्माण केला. ही केवळ साहित्यनिर्मिती नव्हती! ते वेदनेचे भक्तीत झालेले अक्षर रूपांतर होते!

संत तुलसीदासांचे चरित्र म्हणजे नियतीच्या कठोर परीक्षांवर श्रद्धेने मिळवलेला विजय. त्यांच्या डोळ्यांतून वाहिलेले अश्रू आजही त्यांच्या ओव्यांत, दोह्यांत आणि रामनामात मोत्यांसारखे चमकत राहतात. म्हणूनच तुलसीदास हे केवळ संत किंवा कवी नाहीत; ते दुःखाला दिव्यत्व देणारे भारतीय संस्कृतीचे अमर दीपस्तंभ आहेत.

आयुष्याचा शेवटचा काळ त्यांनी काशीतील ‘अस्सी घाटा’वर घालवला. वयाच्या उत्तरार्धात त्यांना हातामध्ये तीव्र वेदना झाल्या, बाहूशूलाने ग्रासलेले असूनही त्यांनी ‘हनुमान बाहुक’ची रचना केली. १६२३ मध्ये आजच्या तारखेला मुखी रामनाम घेत त्यांनी देह त्यागला. त्यांच्या मृत्यूबाबतचा दोहा प्रसिद्ध आहे:
“संवत सोरह सौ असी, असी गंग के तीर। श्रावण शुक्ला सप्तमी, तुलसी तज्यो शरीर॥… 

तुलसीदासांना जे राम अभिप्रेत होते ते राम सद्यकाळात किती जणांच्या हृदयात वसले आहेत हा प्रश्न निराश करणारा आहे! वाराणसीच्या सर्वाधिक प्रसिद्ध घाटांपैकी एक अस्सी घाटाची आजची अवस्था काय आहे? वरुणा आणि अस्सी ह्या दोन नद्यांचा जिथे संगम झाला ते शहर म्हणजे वाराणसी! ज्या घाटावर अस्सीचे पाणी स्थिरावले तो घाट म्हणजे अस्सी घाट!

आजघडीला अस्सी नदीचे रूपांतर अस्सी नाल्यात झालेय. घाटावर रात्री काय चालते त्या विषयी न लिहिलेलं बरे. करुणा, माया, प्रेम, त्याग, आस्था, विश्वास, श्रद्धा, शौर्य, पावित्र्य आणि प्रगल्भता यांचे समृद्ध प्रतीक असणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाचा वापर काहीजण द्वेष तिरस्कार पसरवण्यासाठी करतायत! आज तुलसीदास असते तर रामचरितमानस लिहिण्याबरोबरच, सद्यकालीन कथित रामभक्तांच्या मानसिकतेवर त्यांनी नक्कीच प्रहार केले असते! असो.. 

तुलसीदासांचा एक दोहा आवर्जून सांगावा वाटतो – ‘दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान। तुलसी दया न छाँड़िए, जब लग घट में प्राण॥’
दया करुणा हेच धर्माचा पाया होत, जोवर देहात प्राण आहेत तोपर्यंत दया भाव त्यागू नयेत. अहंकार अभिमान हे सकल पापांच्या मुळाशी आहेत! प्रभू रामाचे नाव घेऊन अनिष्ठ गोष्टी करणाऱ्या लोकांना तुलसीदास देशद्रोही, धर्मद्रोही वाटले तरी त्यात नवल नाही!

खरे राम जाणून घ्यायचे असतील तर अंत:करण शुद्ध असले पाहिजे! बाकी माणूस मेल्यावर देखील राम नाम सत्य है असे म्हटले जातेच की, पण हे सत्य मृत्यूपश्चात कळून काय उपयोग! आज तुलसीदासांचा स्मरणदिवस!

‘तुलसी‘ काया खेत है, मनसा भयौ किसान
पापपुण्य देउ बीज हैं, बुवै सो लुनै निदान… 

– समीर गायकवाड    

Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

इंगमार बर्गमनचा ‘द सर्पंट्स एग’