डोळ्यात आनंदाश्रू आलेला रामकेवल!
काहींचं जगणं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतं. ही उक्ती युपीच्या रामकेवल या मुलाने सार्थ करून दाखवली आहे. 1947 नंतर म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या गावातला तो पहिला विद्यार्थी आहे जो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्याचा सन्मान केला आहे ही देखील एक चांगली गोष्ट! रामकेवल हा केवळ विद्यार्थी नसून त्याच्या घरातला कमावता मुलगा आहे. युपीमध्ये सलग सहा महीने लग्न सराईचा मौसम असतो त्यानंतर तीन महीने ब्रेक घेऊन पुन्हा तीन महिने लग्ने होत राहतात. तर हा लहानगा मुलगा वरातीत डोक्यावर पेट्रोमॅक्स घेऊन चालायचे काम करायचा. रात्री उशिरा घरी यायचा आणि सकाळी उठून 6 किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत जायचा!
हे सर्व वाचायला विचित्र वाटेल पण हे वास्तव आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 77 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच युपीच्या बाराबंकी जिल्ह्यातील निजामपुर इथला रहिवासी रामकेवलने ही कामगिरी केलीय! 15 वर्षीय विद्यार्थी रामकेवल उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषदेची हायस्कूल परीक्षा 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्याचा सन्मान केला आहे, ही चांगली बाब होय. मात्र ही गोष्ट आजवर का होऊ शकली नाही याची कारणे दुःखद आहेत.
तेव्हा आईने लगेच पुढे होत त्याचे डोळे पुसले!
आहेत. रामायण काळात जिचा उल्लेख आहे ती घाघरा नदी यांच्या गावापासून खूप जवळ नाहीये मात्र तिला जेव्हाही पुर येतो तेव्हा त्याचा फटका या गावांना बसतो. केवट होड्या बनवतात, मासेमारी करतात, नदीकाठाच्या भागात मजूरी करण्यात यांचा हातखंडा आहे. याला जोडून नि रामकेवलच्या पिढीजात कामाला जोडून आणखी एक मुद्दा याच नदीशी रिलेटेड आहे, ही नदी बाराबंकी जिल्ह्यातून जिथूनही वाहते तिच्या काठावरील गावांत तिला उद्देशून कजरी, चैती आणि सोहरसारखी लोकगीते गायली जातात. ही माणसं नदीला आई मानतात. तर ही गाणी गाणारा जो समुदाय आहे त्यांचे आणि कहार केवट यांचे साटेलोटे आहे. हा लेहजा नदीकाठातून पुढे कॅरी ऑन होत बिहारमधील छपरा पर्यंत जातो जिथे घाघरा नदी गंगेच्या विशाल पात्रात सामावते. शहरीकरणाच्या कचाट्यातून वाचलेला नदीपरिसर असं याचं वर्णन करता येईल.
रामकेवलचे गाव बाराबंकी जिल्ह्यातील बनीकोंडर तालुक्यात आहे. तो ज्या निजामपूर गावात राहतो ती एक लहानशी वाडी वस्ती आहे जिथे 60 उंबरे आहेत. 300 लोकसंख्या असणारी छोटीशी वाडी. अहमदपूर या गावाच्या पंचायत क्षेत्रात ही वाडी आहे. बाराबंकीचे जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी हे कानपूर आयआयटीचे विद्यार्थी आहेत, 2015 साली ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना रामकेवलच्या भीम पराक्रमाची माहिती मिळताच त्याला सन्मानाने जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवून घेऊन त्याचा सत्कार केला ही गोष्ट इथल्या जातीय विषमतेच्या पार्श्वभूमीवर महत्वाची आहे.
कारण रामकेवलचे पूर्ण गाव अतिमागास जातींच्या लोकांनी भरलेले आहे, इतकेच नव्हे तर अहमदपुर देखील दलितबहुल गाव आहे. गोमती आणि घाघरा या दोन नद्या या जिल्ह्यातून वाहतात. अत्यंत खराब रस्ते, सार्वजनिक वाहन व आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, अस्वच्छतेचे साम्राज्य आणि इन्फ्रास्ट्रक्चरची पुरती वानवा यांनी हा जिल्हा कायम ग्रासलेला आहे. त्यामुळे निजामपुर सारखी गावे अजूनही स्वातंत्र्यकालीन समाजरचनेतच जगत आहेत. अशा गावातून एक मुलगा जो रात्री वरातीत काम करतो नि दिवसा शाळेत जातो त्याचे हे यश विलक्षणच म्हणावे लागेल!
रामकेवल याला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती पण गरिबीमुळे त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे
रामकेवल आपले आईवडील,आजी आजोबा आणि दोन भावांसमवेत! लागले. कष्ट करून मिळवलेल्या पैशातून तो पुस्तके खरेदी करायचा आणि शाळेची फी भरायचा. कुटुंबातील तीन भावांमध्ये तो सर्वात मोठा आहे आणि त्यामुळे त्याला कुटुंबाच्या खर्चाचा भार उचलावा लागतो. वरातीचे काम नसले की वडिलांसोबत मजूर म्हणून कामावर जायचा मात्र त्याने कधी हार मानली नाही! त्याला अभियंता होण्याची आकांक्षा आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्याच्या पुढील शिक्षणासाठी शुल्क माफ करण्याची घोषणाही केली आहे. रामकेवलचे वडील जगदीश मजूर म्हणून काम करतात तर आई पुष्पा प्राथमिक शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करते. रामकेवलच्या यशाने गावातील लोक खूप आनंदी आहेत आणि त्यांना आशा आहे की येणाऱ्या काळात गावातील अधिक मुले त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जातील.
रामकेवलने शिक्षणावरचा फोकस हलू दिला नाही, ध्येयाप्रती तो प्रामाणिक राहिला. कावड वाहणाऱ्या गर्दीत तो गेला नाही की कुठल्या जलशात मिरवणूकीतही तो कधी गेला नाही. मुळात या सर्व गोष्टी त्याच्यासाठी एखाद्या चैनी सारख्या होत्या. जे त्याला परवडणारे नव्हते. राम केवलला जे उमजले ते सर्वांना उमजावे आणि आपल्या शिक्षणाला प्राधान्य देण्यास कटिबद्ध व्हावे. अनेक प्रश्न आपसूक सुटतील! रामकेवलला शुभेच्छा, आशीर्वाद आणि सलाम!
उत्तर प्रदेशात बहुतांश करून क्लेशदायी वा वाईटच बातम्या समोर येतात त्या पार्श्वभूमीवर रामकेवलची बातमी आणि त्याला तिथल्या प्रशासनाने दिलेली सन्मानाची वागणूक या भल्या गोष्टी म्हटल्या पाहिजेत आणि त्याची दखल घेतली पाहिजे!
– समीर गायकवाड
GIPHY App Key not set. Please check settings