प्रेषितांची क्षमायाचना
आपणा सर्वांना रमजानचा महिना लाभला आहे. क्षमा याचनेकरिता यापेक्षा उचित पर्व कुठलेच नाही. रमजान एक शुभ आणि प्रत्येक उपासनेकरिता अल्हाददायक महिना आहे. या महिन्यात फक्त हज करता येत नाही. कारण इस्लामी शरीअतने हजकरिता एक वेगळ्याच महिन्याची घोषणा केली आहे. आणि तो महिना आहे जिलहिज्जचा. रमजान महन्याच्या तीस दिवसांना दहा दहा दिवसांच्या तीन समान संचामध्ये विभाजण्यात आले असून प्रत्येक संचाला ‘अश्रः’ असे नाव देण्यात आले आहे. रमजानचा पहिला अश्रः रहेमत दुसरा माग्फिरत आणि तिसरा अश्रः नरकाच्या अग्नीपासून मुक्तीचा म्हणजे ‘आगसे निजातचा’ आहे. म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त इस्तिगफारचा इतमाम करावा. रमजानच्या महिन्यात प्रत्येक कर्माचे पुण्य सत्तरपटीने जास्त देण्यात येते. म्हणून असे म्हटले जाते की, एकदा इस्तिगफारचे शब्द उच्चारल्याने सत्तर श्लोक उच्चारल्यासारखे होईल.
रमजानच्या महिन्यातील शेवटचे दहा दिवस फार महत्वाचे मानले जातात. कारण या दहा दिवसातील पाच रात्री या फारच महान मानल्या जातात या पाच रात्रींना ‘ताकरात’ असे संबोधले जाते. या पाच रात्रीपैकी एका रात्रीस शब्बेकद्र असे संबोधले जाते. आपल्याकडे खास करून सत्तावीस तारखेस बडीरात किंवा शब्बेकद्र साजरी केली जाते. २१ व्या रोजापासून या महान रात्रींची सुरूवात होते. या शेवटच्या दहा दिवसात रात्रभर नमाज पठण व नामस्मरणाचा कार्यक्रम फार कसरतीने होत असतो. हे दहा दिवस क्षमायाचनेचे आहेत. तुम्ही केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची माफी केली जाईल आणि सद्बुध्दी, सद्भावना, भक्तिभाव अर्पित केला जाईल. अशावेळी प्रफुल्लीत झालेल्या परमेश्वराकडून माफीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या या पाच ताकरात्री आहेत. महिनाभर रोजा करून हलके झालेले मन रात्री उठून अल्लाहच्या दरबारी नतमस्तक होऊन नमाजपठण करून सद्बुध्दीची भीक मागणे अल्लाहला फारच आवडते.
अल्लाहला सर्वात जास्त भिणारे आणि त्यांच्यावर अफाट प्रेम करणारे प्रेषित असतात. या पृथ्वीवर मानवाच्या मार्गदर्शनासाठी प्रथम प्रेषित हजरत आदम अलैहिवस्सलामपासून तर अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद अलैहिवस्सलम पर्यंत सुमारे एक लाख चोवीस हजार इतके प्रेषित अल्लाहकडून पाठविण्यात आले. प्रेषितांना अल्लाहकडून सान्निध्य प्राप्त असते. हजरत मुसा अलैहिस्सलाम तर अल्लाहबरोबर थेट संवाद साधायचे म्हणून त्यांना कलीमुल्लाह म्हणजे अल्लाहबरोबर संवाद साधणारा ही पदवी देण्यात आली होती. तसेच हजरत ईब्राहिम अलैस्सलाम यांना खलीलुल्लाह ही पदवी देण्यात आली होती. खलीलुल्लाह म्हणजे अल्लाहचा मित्र होय. यावरून आपणास कल्पना येईल की प्रेषितांचे अल्लाहबरोबर संबंध कसे असतात. एवढे असूनसुध्दा ते अल्लाहकडून सतत क्षमायाचना करत रहायचे. काही प्रेषितांनी मागितलेल्या क्षमांची शब्दावली अशी आहे.
हजरत आदम अलैहिस्सलाम यांची दुआ, “हे पालनकर्त्या आम्ही स्वतःवर अत्याचार केला. जर आता तू आम्हाला क्षमा केली नाहीस व दया केली नाहीस तर खचितच आम्ही तोट्यात राहू.” ही दुआ अलअराफ या अध्यायातील २३ व्या श्लोकात समाविष्ट आहे. हजरत मुसा अलैहिस्सलाम क्षमा मागताना म्हणाले, “हे पालनकर्त्या मला व माझ्या भावांना क्षमा कर आणि आम्हाला आपल्या कृपा छत्रात घे, तू सर्वात जास्त दयाळू आहेस” यापुढे ते म्हणाले, “आमचा पालक तर तूच आहेस, म्हणून आम्हाला क्षमा कर आणि आमच्यावर कृपा कर, तू सर्वापेक्षा जास्त क्षमा करणारा आहेस.” ही दुआ अल्अअराफ या अध्यायातील १५१ ते १५५ या श्लोकात आली आहे.
नूह अलैहिस्सलाम नावाचे एक प्रेषित होते. ज्यांच्या काळात जबरदस्त पूर आला होता. त्यात त्यांची पत्नी आणि मुलाला देखील बुडवून ठार मारण्यात आले होते. त्याप्रसंगी हजरत नूह अलैहिस्सलाम यांनी अल्लाहना विनवले, ‘हे माझ्या पालनकर्त्या ! मी तुझा आश्रय मागतो. यापासून की ती गोष्ट तुझ्याजवळ मागावी जिचे ज्ञान मला नाही, जर तू मला माफ केले नाहीस आणि दया केली नाहीस तर मी नष्ट होऊन जाईन माझ्या पालनकर्त्या ! मला व माझ्या आई-वडिलांना आणि त्या प्रत्येक माणसाला जो माझ्या घरात श्रध्दावंत म्हणून शिरला आहे आणि सर्व श्रध्दावंत पुरूषांना आणि स्त्रियांना क्षमा कर आणि अत्याचाऱ्यांसाठी विनाशाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीत वाढ करू नकोस” ही दुआ हूद या अध्यायातील सत्तेचाळीसाव्या श्लोकात आली आहे.
अल्लाहच्या सान्निध्यात प्रयाण करण्याकरिता अत्यंत पवित्र आत्मा लागतो आणि पवित्र आत्मा जोपासण्याकरिता अत्यंत सुबक शरीर हवे असते. माणसाच्या हातून दुष्कर्म आणि पापे घडतच असतात. सात्विक जीवन केवळ प्रेषित जगू शकतात. परंतू, खरा दास आणि अल्लाहचा बंदा तो आहे जो पाप घडो अगर न घडो अल्लाहचरणी त्याचे प्रायश्चित मात्र सदैव सुरू असते तो नेहमी क्षमा याचनेत मग्न असतो. बंधुभगिनींनो आपणही या महिन्यात क्षमा याचनेत मग्न राहू या.


GIPHY App Key not set. Please check settings