पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदर्श व्यक्तिमत्वाच्या , दानशूर व कुशल प्रशासक होत्या. त्या वीरांगना अतिशय न्यायप्रिय व दूरदृष्टी असलेल्या ,पुरोगामी विचारांच्या होत्या. अहिल्याबाई शिवभक्त आणि प्रजाहितदक्ष होत्या.अशा थोर अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ में इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्याबाई यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच्या मामाचे आडनाव मैंदाड होते. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकविले होते.
बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे मावळा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार आठ वर्षाच्या अहिल्याबाईना मल्हाररावानी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.
मल्हारराव होळकरांच्या त्या सून झाल्या. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स.१७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावानी अहिल्याबाईना सती जाऊ दिले नाही. बारा वर्षानंतर मल्हारराव होळकर हेही मरण पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.
इंग्रज लेखक लाँरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन , इंग्लंड ची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. भारतातील माळव्याचे जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी , इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केले होते. त्या आधाराने अहिल्याबाईनी इ. स.१७६६ ते इ.स.१७९५ ,म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
राणी अहिल्याबाई यांनी अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले , त्यांचा जीर्णोद्धार ही केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनविले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी , उज्जैन , नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्याबाईनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात इ.स.१७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाई दरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर गाढ विश्वास असल्याचे दिसून येते.
पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई नी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत असे म्हणतात.
पेशव्यांनी परवानगी दिल्यावर ज्या माणसाने त्यांना विरोध केला होता, त्यास चाकरीत घेऊन तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तकपुत्र )यास सैन्याचा मुख्य करून अहिल्याबाईनी दिमाखात माळव्यास प्रयाण केले.
अहिल्याबाईनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गार्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. राज्याची राजधानी नर्मदातीरी असलेल्या महेश्वर येथे होती तरीही इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे हे अहिल्याबाईनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले. अनेक उत्सव भरवले. हिंदू मंदिरामध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या. अहिल्याबाईनी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईंच्या स्मृतीस अभिवादन म्हणून सन १९९६मध्ये इंदुरातील नागरिकांनी त्यांच्या नावांने पुरस्कार सुरु केला. तो दरवर्षी जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ इंदूर येथील विश्वविद्यालयास त्यांचे नांव दिले आहे.
अहिल्याबाईंच्या नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईनी आश्रय दिला होता. कारागिरांना , मूर्तीकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी सुरु केली होती. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गायी देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.
अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्याबाई होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळाला पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संतांचा दर्जा दिला.
GIPHY App Key not set. Please check settings