in

सुखाचा राजमार्ग-पुस्तक परिक्षण

सुखाचा राजमार्ग (कथासंग्रह) – पुस्तक परिक्षण

               ✍️ डॉ. सौ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी. 

     


पुस्तक परिक्षण

सुखाचा राजमार्ग (कथासंग्रह)

लेखिका-डॉ. सौ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी.

पुस्तक परिक्षण -श्री. बी. बी.गुरव

माजी मुख्याध्यापक जनतारा हायस्कूल व ज्युनिअर काँलेज, जयसिंगपूर.

       

       डॉ. सौ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी यांनी लिहिलेले ‘सुखाचा राजमार्ग ‘हे कथासंग्रहाचे पुस्तक वाचनात आले.मजबूत बांधणीचे, उत्कृष्ट छपाई असलेले, आकर्षक मुखपृष्ठाने सजलेले हे पुस्तक पाहताक्षणीच माझ्या पसंतीस उतरले. मी हे पुस्तक वाचण्याच्या अक्षरशः प्रेमात पडलो.वाचन संपल्यानंतर सविस्तरपणे पुस्तक परिक्षण करण्याचा मोह मला आवरता आला नाही.

      

        ‘सुखाचा राजमार्ग ‘हे या पुस्तकाचे शीर्षक सर्वांना खरोखरीच अंतर्मुख करतं.या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोन-तीन शब्दांच्या चार ओळी लिहिल्या आहेत.


जीवनातील आपत्तीना

निर्धारपूर्वक तोंड देण्यात

लपला आहे…..

सुखाचा राजमार्ग.

      

      या चार ओळी किती सार्थ आहेत याचा प्रत्यय पुस्तकातील प्रत्येक कथा देत जाते. या कथासंग्रहात तब्बल साठ कथा समाविष्ट आहेत. दोनशे पृष्ठांचंहे आकर्षक पुस्तक साहित्य क्षेत्रातील एक दर्जेदार पुस्तक आहे यात तिळमात्र शंका नाही. कथासंग्रहाच्या मलपृष्ठावर लेखिकेने मांडल्या आहेत या अर्थपूर्ण व समर्पक ओळी….

मनाची श्रीमंती दाखवणं,

श्रमस़ंस्काराची शिदोरी जपणं,

मुलीची माया अनुभवणं,

उदात्त निर्णय घेणं

सदृढ मातृत्व अंगीकारणं

मायेची इस्टेट वाढवणं

देण्यातील आनंद साठवणं,

स्वच्छंदी जीवन जगणं!

       

       कथांच्या शीर्षकातून गुंफलेल्या या ओळीतून कथावाचकांना सुखाचा राजमार्ग नक्की गवसेल असा  संदेश लेखिकेने कल्पकतेने दिला आहे. सर्वच कथा छोटेखानी, घाटदार, कसदार व चटकदार आहेत. जीवनावर भाष्य करणाऱ्या आहेत.

       सुखाचा राजमार्ग या कथासंग्रहातील ‘ नकुशीचा आहेर’ या पहिल्याच कथेत केवळ पैशालाच जगात किती महत्त्व दिले जाते. सख्खे भाऊ बहिणीही गरीब बहिणीचा कसा पाण उतारा करतात, हक्काच्या माहेरातही गरीब बहिणीला कसा अपमान सहन करावा लागतो याचे सुंदर चित्रण या कथेत वाचायला मिळते.

        

       नोटांच्या बंडलाची बँग परत करणारा योगेश  ‘श्रमसंस्काराची शिदोरी’ या कथेत संस्काराचे महत्त्व सांगताना म्हणतो ‘ मला यातील रकमेपेक्षा माझ्या आईने दिदीला व तिच्या परिवारासाठी स्वतः तयार करून दिलेली शिदोरी लाख मोलाची आहे’ एवढेच नव्हे तर बक्षिस म्हणून दिलेले एक हजार रूपये तो नम्रपणे नाकारतो.ही कथा खरोखरीच संस्कारक्षम व अनुकरणीय आहे. 

      

       अमर प्रेमाची समग्र कहाणी या कथेत लेखिकेने शारीरिक संबंध नसलेल्या पवित्र प्रेमाची सुंदर मांडणी केली आहे. संजीवनीवर निखळ प्रेम करणाऱ्या बाळासाहेब या वयस्क दानशूर व्यक्तीची ही समग्र कहाणी थेट ह्रदयाला भिडणारी आहे।

       

        ‘ताई तूच सुखी रहा’ या कथेत लहान बहिणीच्या सासऱ्याशी विवाह करणाऱ्या कमलाताईच्या रुपानं समाजात घडणाऱ्या विचीत्र घटनांचा गोफ समोर येतो आणि शेवटी लहान बहिणीच्या सुमनच्या आत्महत्येनं वाचकाचं मन सुन्न होतं. या कथेत प्रेमाच्या आंधळ्या बहिऱ्या आणि मुकेपणाची साक्ष आणखी एकदा पटते.

       

        दारुड्या वडिलांना आपण जाणतो पण दारूड्या आईची जगावेगळी कथा ‘आईचा घोट, मायेला गालबोट’ या कथेत पहावयास मिळते. बाजारात आलेल्या दारुड्या आईच्या कमरेचे पैसे दारूडा बाप फळवितो.त्याची लहान मुलगी व मुलगा त्यामुळे अधिकच विमनस्क होऊन रडत बसलेले आहेत आणि खरोखरीच फाटलेलं आभाळ, दुभंगलेली धरणी समोर येते. अशावेळी आम्ही शिकायचं काय? आम्ही करायचं काय? या लेखिकेच्या दोन ओळी काळजाला घर पाडून जातात.       

       

          अपेक्षांचे ओझे’ ही कथा मुलांकडून अवास्तव अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कथा आहे. पालकांनी मुलांकडून अपेक्षा ठेवताना त्या मुलांना झेपतील, पेलतील अशाच ठेवाव्यात हा महत्त्वपूर्ण संदेश लेखिकेने या कथेतून दिला आहे.

       

           ‘पहा कर्माची गती किती न्यारी’  ही कथा कर्माची गती किती न्यारी’ ,राजाचा बनला भिकारी’ हे सिद्ध करणारी अफलातून कथा आहे. नोकरी लागण्यासाठी खोटा घटस्फोट घेणाऱ्या मनीषाला खरोखरीचा घटस्फोट घेण्याची वेळ येते. ही अशी लोक विलक्षण कथा वाचकांना स्वतः वाचूनच त्याचे मर्म जाणून घ्या. असा संदेश देते.

       

         सासर व माहेर हे स्त्रीचे दोन डोळे आहेत. धनाच्या लालसेने भावाच्या इस्टेटीत वाटणी मागून स्वतःचे जीवन दुःखी करून घेणाऱ्या बहिणीची व्यथा’ मायेची इस्टेट’ या कथेत मांडली आहे.

       

       ‘ मुलीची माया’ या कथेत मुलापेक्षा मुलीचा वाढदिवस वडिलांनी थाटामाटात का केला याचं रहस्य वाचकांना कथा वाचल्यावरच कळेल, अशी सुंदर मांडणी लेखिकेने खुबीने केली आहे. आदर्श ज्येष्ठ नागरिकांच्या सोनेरी संसाराचे सुखाचे रहस्य आयुष्याची सोनेरी सायंकाळ या कथेत वाचावयास मिळते.

       

        अशा प्रकारे ‘सुखाचा राजमार्ग’ या कथासंग्रहातील प्रत्येक कथा काही ना काही महत्त्वाचा संदेश देणारी आहे. वाचकाला उत्कट आकर्षण निर्माण करणारे उत्कृष्ट कथाबीज तर प्रत्येक कथेत आहेच पण त्याचबरोबर प्रत्येक कथेचा शेवट व त्यातील संदेश ‘सुखाचा राजमार्ग’ दाखविणारा आहे याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानोपानी येतो.

        ‘सुखाचा राजमार्ग’ या पुस्तकाच्या समग्र वाचनानंतर ज्यावेळी सर्व कथांचे मनन केले त्यावेळी लक्षात आले की…..

       

         या कथा अतिशय आटोपशीर आहेत.या कथा आपल्या अवतीभवती घडलेल्या आहेत असे वाटते.या कथामध्ये आलेली पात्रे सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करतात.या कथा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या आहेत.या कथांमधून निश्चितच एक जीवनमार्ग म्हणजेच सुखाचा राजमार्ग सापडतो.

       

           या कथासंग्रहात लेखिकेने मांडलेली भाषा साधी सोपी असून सहजशैलीत प्रकट झाली आहे. त्यामुळे वाचकांच्या मनाला एक प्रकारची प्रसन्नता मिळते.प्रत्येक कथा वाचकाला अंतर्मुख करते.प्रत्येक कथेचे बीज व पात्रे लक्षात ठेवल्यास कोणीही कोणालाही या कथा सहज सांगता येतील अशा आहेत.

      

    डॉ. सौ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी यांना शिक्षणशास्त्रातील पीएच्.डी.झालेली आदर्श प्राथमिक शिक्षिका या रूपात ओळखत होतो. त्यांनी वीस वर्षाच्या अथक परिश्रमानंतर संपादित केलेले ‘हिंदी लोकसाहित्य का खजाना’ हे पुस्तक मी वाचले होते. एक प्राथमिक शिक्षिका साहित्य क्षेत्रात इतकं महत्त्वपूर्ण भरीव कार्य करू शकतात. हे पाहून एक भगिनी म्हणून मला खूप अभिमान वाटतो.

Read More 

What do you think?

35 Points
Upvote Downvote

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

इरेना सेंडलर – स्त्रिया जेव्हा विकारग्रस्त होतील..

अक्षय तृतीया – शेतकरी ते बांके बिहारी!